पुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे धरणे बांधणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘धरणांद्वारे पूर नियंत्रण-मिथक आणि सत्य’ या विषयावर डॉ. दीपक मोडक बोलत होते. शिवाजीनगर येथील दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ उपस्थित होते.
डॉ. दीपक मोडक म्हणाले, ‘यंदा सगळीकडे एकदाच पाऊस पडल्यामुळे अनेक धरणांतून पाणी सोडावे लागले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी नदीपात्रात माती, राडारोडा, अवैध बांधकाम केल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून पात्रातील पाणी बाहेर येते व पूर परिस्थिती निर्माण होते; तसेच नदीच्या पात्राच्या शेजारी ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते यामुळेही पाण्याला अडथळा होतो. बंधारे किंवा पूल बांधताना नदी प्रवाहाला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवून, पुरशोषण क्षमता निर्माण करता येते का याचा अभ्यास करायला हवा.’
प्रास्ताविकामध्ये प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, ‘ब्रिटीश काळातही अनेक धरणे बांधली गेली आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात धरणे महत्त्वाची भूमिका बजावतात.’
सूत्रसंचालन विनय र. र. यांनी केले. शोभा नहार यांनी आभार मानले.